शिवमय मी (भाग २) - कथा

ओम नम: शिवाय...  मंत्राचा गुंगी पसरवणारा स्वर आसमंतात पसरल्याचा भास होत होता. किती शांतता



असते समाधी अवस्थेत. भगवान शंकर समाधी अवस्थेतच एवढे मग्न का असतात याच कारण फक्त समाधीमधे असतांनाच कळू शकत. अनंत काळापर्यंत समाधीतच राहाव, कधी न परत याव. अमरत्व, विश्वविजय, गौरव, किर्ती, साम्राज्य या सगळ्या गोष्टी गौण वाटायला लागतात.

सगळ जग सोडुन मी इथवर आलो होतो. माझ साम्राज्य, नातेसंबध आणि माझी प्रिय पत्नी, माझी अर्धांगीनी, मंदोदरी. हो, ती मला सर्वात जास्त प्रिय होती. जिवनातल्या क्षणाक्षणाला तिने मला साहाय्य केल होत. मला सगळ काही अर्पण केल होत. 

मला आमच्या पहील्या रात्रीची आठवण झाली, कधीही न विसरणारी ती शरद पौर्णिमेची रात्र. त्या रात्रीतल्या निशिगंधाच्या चिमुरड्या फुलांचा सुगंध अजुनही दरवळल्या सारखा वाटतोय. मी शयनगृहात शिरताच मला एका अभूतपुर्व गोष्टीचा अनुभव मला आला. माझी चाहूल लागताच ती उभी झाली. हलकेच तिने घातलेल्या दागदागिन्यांची किणकिण झाली. मी तिच्याकडे एकच कटाक्ष टाकला. यापेक्षाही अप्रतिम सौंदर्य मी आजपर्यंत कधीच अनुभवल नव्हत. राक्षसराज मायासुर आणि अप्सरा हेमा यांची ती कन्या होती. जसा मी अर्ध राक्षस अर्ध ब्राम्हण होतो, तशीच ती अर्ध राक्षस अर्ध अप्सरा होती. एक तर तिचा वर्ण शुभ्र होता आणि त्यात तिने परिधान केलेल्या काळ्या वस्त्रांत तर ती खुलून दिसत होती. कमरेपर्यंत रूळलेला तिचा केशसांभार तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होता. मला तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा एका स्त्रीविषयी ओढ प्रचंड निर्माण झाली होती. क्षणभर काय कराव हे मला काहीच सुचल नाही. मनात एक विचित्र प्रकारची हूरहूर होत होती. मी तिच्याकडे लक्ष न देता सरळच चौथाऱ्याकडे गेलो. वरूनच नगराकडे एक कटाक्ष टाकला. मंद मंद चंद्राच्या प्रकाशात संपुर्ण नगरी निद्राधीन झाली होती. समोरच्या प्रांगणात एका डबक्यात एक हंसाच जोडप एकमेकात मान खूपसुन झोपी गेल होत. एक वेगळीच धुंदी या वातावरणात होती. हळुच दागिण्यांची किणकिण पुन्हा झाली आणि ती माझ्या मागे येऊन उभी राहीली. तिच्या शरिरातून मादक गंध दरवळत होता.
दबक्या आवाजात ती म्हणाली "आमच्याकडून आज कुठला अपराध झाला आहे का, जे स्वामी मला विसरून आज बाहेरच्या चांदण्यामधे व्यस्त आहेत?"
मी मागे वळुन तिच्याकडे बघितल, ती डोळे खाली करून अंग सावरून उभी होती.
चंद्राच्या प्रकाशात तिचे काळे वस्त्र, दागदागिने चमचम करत होते. हवेची आलेली झुळुक तिच्या गालावर आलेल्या केसांच्या लटांना हलकेच झुलवत होती. 
खाली बघतच ती बोलु लागली "असे असेल तर स्वामींनी आम्हाला क्षमा करावी". बोलता बोलता हळुच तिने दृष्टी वर केली आणि मी तिच्याकडेच बघतोय हे जाणून झटकन लाजून खाली केली.
"नाही, तुमच्या कडून कुठलाही अपराध झाला नाही" मी म्हणालो.
"स्वामींची हरकत नसेल तर आम्ही त्यांना काही देऊ ईच्छितो" ती म्हणाली.
"नक्कीच... निसंकोच द्या" मी उत्तरलो.
हळुच हाताची मुठ उघडत तिने हात माझ्यासमोर धरला. 
"हे काय!!!" मी कूतुहलतेने तिच्या हाताकडे बघत म्हणालो.
तिच्या हातात निशिगंधेची कळी होती. तिने अलगदच हात खाली घेतला आणि कळी हवेवर तंरगायला लागली. कदाचीत तिला हे दाखवायच होत की ती मायामंत्रात पण निपुण आहे. हळुहळु कळी खुलायला लागली आणि तिच फुलात रूपांतर झाल.

"आम्हाला माहीत आहे तुमच्यासारख्या क्षत्रियाला या कळीच काहीच महत्व नाही, पण आपली पहीली भेट नेहमीच आठवणीत राहावी म्हणून...."

"महत्व का नाही.... नक्कीच महत्व आहे" मी मधेच तिला अडवत म्हणालो.
"मला पहिल्यांदाच अस्त्र-शस्त्राशिवाय अशी सुंदर भेट आयुष्यात मिळाली आहे. मी ही भेट सदैव जपून ठेवेल" मी कळी हातात घेत उत्तरलो. तिने मानेनेच तिने होकार दिला. 
"पण आम्हाला तुम्हाला द्यायसाठी काहीच नाही" मी म्हणालो.
"स्वामी, आम्ही तुम्हाला काही भेट देणार अशी तुमची काही अपेक्षा होती का?" ती म्हणाली.
"नाही तर..." मी म्हणालो.
"मग आम्ही तरी अशी अपेक्षा का ठेवावी! आणि तसही, ते कसल प्रेम ज्यामधे अपेक्षा असतात" ती लाजून म्हणाली.
खर होत तिच म्हणण. त्या रात्रीत एक जवळीक होती, एकमेकांविषयी आदर होता. खरच किती सुंदर असत प्रेम. प्रेम.... कसलीही अपेक्षा नसणार एक आदरयुक्त आकर्षण.
मी तिचा हात माझ्या हातात घेतला. तोच तिच्या गालावरची खळी खुलली. आम्ही दोघेही एकमेकांकडे बघुन हसलो. मात्र त्याच क्षणात रात्र कुठे हरवली मला कळलच नाही.

पण हे काय.....प्रेम... रात्र... मंदोदरी....!!!
मी तर समाधी अवस्थेत होतो, मग हे सगळे विचार आले कूठुन? मला आता आजुबाजुची थंड हवा जाणवायला लागली होती. शरीराच्या वेदना जाणवायला लागल्या. थंड थंड श्वासाची अनूभुती व्हायला लागली.

मी समाधी अवस्थेतुन बाहेर आलो होतो. मी नेत्र उघडले, तोच सुर्याचा प्रकाश नेत्रांना सहावेनासा झाला. डोक्यावरती जोडलेले हात खाली आले. किती तरी तप उलटून गेले होते. मी किती काळ तपस्या करत होतो याच मला भान नव्हत. माझ्या छातीपर्यंत आलेल मातीच धुड मी हातानी मोडुन काढल. पायांना चिकटलेले मुळ उपटून काढले.

मला कळुन चुकल होत, माझी तपस्या भंग पावली होती. 
नेत्र रागाने लालबुंद झाले आणि एकच वीरश्रीयुक्त गर्जना उठली.

"कोण आहे ज्याने माझी तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला? सामोर ये..." पण काहीच उत्तर आल नाही. 

"इंद्रss... जर हे दृशकृत्य तुझ असेल, तर येणाऱ्या फळाला तयार राहा. कामदेवाच्या साहाय्याने माझ्या मनात कामुक विचारांची उत्पती केली, आणि माझ्या तपस्येत विघ्न आणल असेल तर समोर ये कपटी देवता."

तपस्या सुरू करून किती काळ लोटला याची मला काहीच कल्पना नव्हती. सगळी तपस्या धुळीस मिळाली या विचाराने सार अंग कस शहारून उठल. माझ मनोदर्य खचल, तातांना काय तोंड दाखवू या विचाराने मन ग्रासून गेल. भगवान शंकराला मी प्रसन्न करू शकलो नव्हतो, याची खंत काही केल्या मनातून जात नव्हती. सगळ जीवन निरर्थक वाटायला लागल आणि शेवटी मी ते संपवण्याचा निर्णय घेतला.

शरीरातली सगळी शक्ती एकवटली. हाताच्या मुठी आवळल्या गेल्या आणि एकच  गर्जना केली. दोन्ही डोळ्यामधे सूर्याच्या किरणांचे तप्त शक्तीपुंज जमा झाले. योग्य शक्ती डोळ्यामधे जमा झाली याची खात्री करून शिवलिंगाच्या समोर थोड्याश्या मोकळ्या जागेत शक्ती किरणांचा प्रहार केला. किरणांचा प्रहार इतका त्रीव होता की त्या मोकळ्या जागेत छोटासा बोगदाच तयार झाला. त्यात धगधगता अग्नी प्रज्वलीत झाला. त्याला यज्ञकोटीच स्वरूप प्राप्त झाल. उजवा हात लांबवला आणि नेत्र बंद केले. माया मंत्राचा उच्चार केला. त्याच क्षणी हातात धारधार एकधारी खडग निर्माण झाल. खडग हातात धरून, आकाशाच्या अनंतात नेत्र स्थिरावले.

"हे महादेवा...sss.....क्षमा कर.....
तपस्येचा निर्धार करून, ती तपस्या मी पुर्ण करू शकलो नाही प्रभू.
या पापाच प्रय:श्चित आता माझ्या बलिदानानेच पुर्ण होईल.
उदार हृदयी होऊन क्षमा कर शंकरा....क्षमा कर."

एका हाताने खडगाची मुठ आवळली आणि दुसरा हात खडगाच्या तर्जनीवर स्थिरावला. धारधार खडग मानेच्या वरच्या बाजुला नेले. अधोवदन होऊन मान खाली नेली. खडगाच धारधार पात सुर्य प्रकाशात कस चकाकुन उठल. डोळे बंद केले, तरी मंदोदरीचा चेहरा त्यापुढून हटत नव्हता. मनोमन तिला क्षमा मागितली. दोन्ही हातांच बळ एकवटून निमीर्षार्धात मानेवर चालवल....

मंद मंद श्वास चालु झाला, अंधूक अंधूक मला दिसायला लागल. मला वास्तवाच भान आलेल नव्हत. माझेच दोन्ही हात मला दिसले. मी कदाचित निपचीत पडलेला होतो. दोन्ही हात भुमीवर टेकवून उभ राहायचा प्रयत्न करू लागलो. पालापाचोळ्याचा लयबद्ध करकर आवाज कानी पडू लागला. बाजूला माझ्याच रक्ताने माखलेल माझ खडग मला पडलेल दिसल. मागे वळून बघताच माझ अंग कस शहारून उठल. शिवलिंगासमोरच्या धगधगत्या यज्ञकुटीत माझच मुख पेटत होत. क्षणभर मला काहीच कळेणास झाल. मला सगळा प्रकार लक्षात आला, मी स्वतःला बळी दिल होत. पण काही कारणाने ते बलिदान भगवान शंकराला मान्य नव्हत. आसमंतात नेत्र स्थिराऊन कंठ दाटल्या स्थितीत उत्तरलो.

"हे महादेवा...मला माहीती आहे तुला ही बळी मान्य नाही.
पण हे देवाधीदेवा, कृपा करून या तुच्छ भक्तावर थोडा तरी उदार हो आणि ही बळी मान्य कर. ही जीवनयात्रा ईथेच संपवू दे."

मनोमन मला स्वतःवरच क्रोध यायला लागला. डोळे रागाने लालबुंध झाले. तपस्या भंग झालीच तरी कशी. मी स्वतःला तरी कशी परवांगी दिली समाधी अवस्थेतून बाहेर यायची. चित्त अस्थिर झाल, मी पेटून उठलो आणि वीरश्रीयुक्त गर्जना केली.

"हे इंद्रा, मी..रावण... ही प्रतिज्ञा करतो...
जर मी जिवंत राहलो तर तुझा पुर्ण मुळासकट निपात करेन. या जगात तुला कुठेही लपायला जागा मिळणार नाही, तुला माझा दास बनवुन ठेवेल.
तुझ्यामुळेच, केवळ तुझ्यामुळेच भगवान शंकर माझ्यावर रूष्ठ झाले.
माझ्या तपस्येत विघ्न आणल्याचा तुला परिणाम भोगावाच लागेल."

रागाच्या भरात मी काय करतोय याचे मला काहीच भान नव्हते. मनान कोलाहल माजला होता. क्रोधाचा धगधगता भडाग्नी पेटून उठला होता आणि कुठल्याही परीस्थित तो विझायला तयार नव्हता. रक्ताने माखलेल खडग मी पुन्हा उचलल. मान खाली करत दोन्ही हातात खडग पुन्हा सज्ज केल. चित्त स्थिर व्हायला तयारच नव्हत. इंद्र, भगवान शंकर, भंग झालेली तपस्या, सुडाचा भडाग्नी, प्रतिज्ञा....
आणि पुन्हा तेच खडग मी मानेवर चालवल.

मी पुन्हा उठून जागेवर बसलो. काय कराव ते सुचेनास झाल होत. गुरूकुलतल्या मातेची आठवण तेव्हा त्रिवत्रेन झाली. क्षणभर वाटल की मातेच्या कुशीत जाऊन डोक टेकवाव. मग तातांच्या जवळ जाव आणि समजुतीचे चार शब्द एेकावे. चतुरतेने पुन्हा एकदा कुंभकर्णाला द्वंदाच आव्हान देऊन हरवाव. शुर्पनखेसोबत जाऊन विभीषणाची पुन्हा एकदा खोडी काढावी. माझे तात, आजोबा राक्षसराज सुमालीच्या चरणावर पुन्हा एकदा डोक ठेऊन त्यांना सांगाव "तात, हा रावण आपल सगळ साम्राज्य, ऐश्वर्य पुन्हा स्वतःच्या बाहूबळावर मिळवेल". काही केल्या हा मोह सुटत नव्हता.
डोळे पणावले, कंठ दाटून आला. बाजुला पडलेल खडग पुन्हा एकदा ऊचलल. सगळ्या गोष्टींचा विसर पाडला. मनोमन म्हटल

"हे प्रभू क्षमा करा..." आणि खडग पुन्हा मानेवर चालवल.

माझ यज्ञकुटीत पडलेल्या तिसऱ्या मस्तकाकडे मी अधोवदनाने बघत होतो. भगवान शंकराच्या मनात काय होत याची मला काहीच कल्पना नव्हती. पण मी आता थांबणार नव्हतोच. ज्या विश्व विजयासाठी ही तपस्या आरंभ केली होती ती सगळी स्वप्न भंग पावली होती. राक्षसांना अधिक बळकट करण्यासाठी विश्व विजय गरजेच होत. प्रथम पाताळ, मग पृथ्वी आणि मग स्वर्ग. पाताळ जिंकल्याने राक्षसांच्या सामर्थ्यात भर पडणार होती, पृथ्वी जिंकल्याने अमाप ऐश्वर्य आणि स्वर्गामुळे देवांच सगळ आधुनीक विज्ञान आम्हा राक्षसांना प्राप्त होणार होत. आणि त्याहूनही महत्वाच म्हणजे देवांना प्राप्त झालेल अमृत आम्हाला मिळणार होत. या सगळ्या गोष्टींनी मी काय काय करू शकणार होतो याची मी फक्त कल्पनाच करू शकत होतो. मला हे सगळ हवच होत आणि हे मला मिळवायचच होत. पण आता हे शक्य नव्हत. मनाला स्थिर केल. हातात खडग घेतल. मनोमन मंत्राचा उच्चार केला "ओम नम: शिवाय" आणि खडग पुन्हा मानेवर चालल.

आज माझे अधिकाअधिक मस्तक भक्षण करण्याचा जणू यज्ञकुटीन निर्धारच केला होता. आणि मी पण त्यासाठी सर्वार्थाने सज्ज होतो. हातात खडग घेऊन मी यज्ञकुटीजवळ ऊभा होतो. संथपणे वारा वाहात होता. रथावरच्या ध्वजासारखे माझे केस तो उडवत होता. माझ्या जन्मापासुनच मला मिळालेल सिंहासन, मला अत्यंत प्रिय होत. मला तिन्ही लोकांच राज्य अनुभवायच होत. पहिले पाताळाचा राक्षसराज म्हणून, मग पृथ्वीवरचा दिग्गज बनुन आणि मग देवतांचा राजा बनून. 
पण हे सगळ कदाचीत नशिबात नव्हत. हलकेच माझ्या ओठांवर स्मित हास्याची रेघ उमटली आणि तसच मी मानेवर खडग चालवून दिल.

यज्ञकुटीत मस्तकांचा जणू सडाच पडला होता. चट चट आवाज करीत यज्ञकुटीतला अग्नी सगळी मस्तक जाळत होता. मला तो दिवस आठवु लागला जेव्हा तातांनी मला राक्षसांचा संहार कसा झाला ते सांगितल होत. राक्षस प्रजाती एके काळी खुप संमृद्ध होती. देवाना नमवून राक्षसराज माली आणि सुमाली विश्वविजयी ठरले होते. मग देवांनी विष्णूचा धावा करून त्याला प्रसन्न करून घेतले. विष्णूने त्यांना साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. मग विष्णूने राक्षसांना आव्हान देऊन युद्धात आमचा एकतर्फी पराभव केला. राक्षसराज माली युद्धात मारले गेले तर तातांना पाताळ पलायन कराव लागल. सगळ्या राक्षस जातीचा संहार झाला होता. राक्षसांना पृथ्वीवर प्रवेश निशिद्ध होता, कित्येक तप विष्णूचे दुत पृथ्वीवर पाळत ठेऊन फिरत होते. राक्षसांचा हा अपमान सहन करण्यासारखा नव्हता. विष्णु या सगळ्या प्रकाराच्या मागे होता. माझ्या मनात सुडाचा धगधगता अग्नी पेटुन होता. पण परमपिता ब्रम्हाकडून मी आधिच तसा वर घेतला होता. मला कोणताही देव, दानव, दैत्य, राक्षस, पन्नग, नाग, विद्याधर, गंधर्व, यक्ष, किन्नर, चारण वधू शकत नव्हता. पण भगवान शंकराच्या भंग झालेल्या तपस्येच्या दुख:पुढे या सगळ्या गोष्टी गौण होत्या. हातातल खडग पुन्हा चालवल....हे दुख: संपविण्याठी...

माझ्या पितांचा दुसरा जेष्ठ पुत्र कुबेर, हा लंकेचा राजा होता. लंका ही कधीकाळी माझ्या आजोबा राक्षसराज सुमालीची होती. विष्णूने जेव्हा राक्षसांना हरवल तेव्हा तात पाताळात जाऊन राहीले. तेव्हा लंका नगरी ही कुबेराने हस्तगत केली. मला तातांचा हा पुत्र अजिबात आवडायचा नाही. कारण त्याने लंका नगरी स्वतःच्या बाहूबळावर नव्हे तर देवतांच्या हाताखाली चाकरी करून मिळवली होती. तो इंद्राच्या दरबारात त्यांचा धनकोश सांभाळायचा. आणि म्हणूनच तो लंका नगरीच्या सिंहासनाच्या लायकिचा नव्हता. मी गुरूकुलात असतांना तो सहसा तिथे भेट द्यायचा. आणि आम्हा तिन्ही भावंडाशी गर्वाने वागायचा. भगवान शंकराचा पुत्र गणेशाने याची भर सभेत अशीच फजिती केली होती. तरीही याचा गर्व पुर्णपणे संपला नव्हता. तसाच देवांचा राजा इंद्र हा सुद्धा इंद्रपदाच्या लायकिचा नव्हता आणि त्याला नमवून मी त्याची लायकी त्याला दाखवून देणार होतो. कित्येक दिवस हा द्वेषाग्नी भडकतच होता. पण हे सगळ आता शक्य नाही हे जाणून मी पुन्हा मानेवर खडग चालवल.

मी पुन्हा आता तपस्या सुरू करू शकत नव्हतो. आणि तपस्या भंग झाल्याचा कलंक पण स्वतःवर लाऊन घेऊ शकत नव्हतो. स्वयम विश्वमित्रांनी मला म्हटल होत "तु या जगातला सर्वश्रेष्ठ ज्ञानी पुरूष होशील". गदायुद्ध, खडगयुद्ध, धनुर्विद्या, अस्त्रविद्या, वेदाध्ययन, मोक्षशास्त्र या सगळ्यांमधे मी निपुन होतो. मग माझ्याकडून तपस्येमधे कोणतीच चुक होण शक्यच नव्हत, हे नक्कीच कोणाच तरी कारस्थान होत. ऐवढ सगळ झाल्यावर मला अत्यंत पश्चाताप होत होता. आणि याच पश्चातापाच्या भरात मी पुन्हा खडग चालवल.

एका द्विधा मनस्थितीत मी तसाच भुमीवर पडुन होतो. मनात संमिश्र विचार दाटून आले होते. एकाच क्षणात क्रोध, तर दुसऱ्या क्षणात स्वतःचीच कीव येत होती. माझ्या डोळ्यासमोर माझा सगळा जीवनाचा परिपाठ उठून उभा झाला. माझा जन्म, गुरूकुलातील घेतलेली सगळी विद्या, परमपिता ब्रम्हाकडून घेतलेला वर, विश्वविजय करण्याची महत्वाकांक्षा, मंदोदरीशी माझा विवाह. क्षणात आलेला राग मी डोळ्यात शक्ती किरणांच्या माध्यमात जमा केला. आणि हसता हसता तो मी समोरच्या निष्पर्ण कदंब वृक्षावर काढला. क्षणार्धात वृक्षाचा कोळसा झाला. ते बघताच एका आसुरी शक्तीचा आनंद मला झाला. काही केल्या माझ्या आक्राळविक्राळ हसण्यावर माझ नियंत्रण बसत नव्हत. हसत हसतच मागे वळुलो तर शिवलिंगाच दर्शन झाल. अचानक माझ्या मनाला उद्विन्गता आली आणि कंठ दाटून आला. हसता हसताच हुंदका फुटला. दोन्ही गुडघ्यावर मटकन मी खालीच बसलो. तपस्या भंग झाल्यामुळे अंत:करणात खोलवर वार झाला होता. डोळ्यामधुन पडलेले अश्रु भुमीत मुरले. मी विमनस्क अवस्थेत अधोवदनात यज्ञकुटीकडे बघत होतो, कारण झालेला सगळा प्रकार काळीज विदीर्ण करणारा होता. हे मला काय होतय याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. शेवटी हात जोडून, डोळे बंद करून एकाग्रतेची लय साधू लागलो. मनातले सगळे विचार धूडकाउन लावले. चित्त स्थिर झाल. हातात पुन्हा खडग घेऊन ते मानेवर चालवल.


शुन्य भावनांनी मी मान खाली करून उभा होतो. कित्येक प्रहर ऊलटुन गेले होते तरीही कसल्याच गोष्टीच भान मला नव्हत. कितीतरी मस्तकांचा सडा यज्ञकुटीने भक्षण केला होता, तरीही मी मृत्युच्या दारापर्यंत पोहोचू शकलो नव्हतो. आता शेवटचा एकच पर्याय उरला होता. योगमाध्यमाने देहावसान करण. मी शिवलिंगाची अखेरची पुजा केली. मनात आता कसलीही ईच्छा नव्हती. जग, ईच्छा,आकांशा, शौर्य, पत, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी गौण वाटायला लागल्या. मनोमन शंकराला अभिवादन केल, क्षमा मागीतली. शिवलिंगासमोर नदमस्तक उभा झालो, नेत्र मिटले, आणि प्राण सोडण्यास सज्ज झालो. 

मंद मंद वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग अचानक वाढला. आजुबाजुचा पालापाचोळा हवेत फेकला जाऊ लागला. वातावरणात पुन्हा बदल झाला. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात विजा कडाडू लागल्या. क्षणात अंधार दाटू लागला. प्रलय येतो की काय अशी स्थिती उत्पन्न झाली. कसलातरी अभुतपुर्व नाद आसमंतात गुंजारला. मी पूर्वी कधीच ऐकली नव्हती अश्या स्वर्गीय वाणीत कोणीतरी मला आदेश केला.

"थांब रावणा....!!!"
क्रमश:

उपसंहार
"शिवमय मी - भाग २" लिहीतांना पुष्कळ गोष्टी ध्यानात घ्याव्या लागल्या. हा भाग वाचतांना पुष्कळ वाचकांचा गोंधळ नक्कीच उडेल, कारण प्रत्येकाचा तपस्येबाबतचा समज असा आहे की तपस्या करतांना कुठलेही विचार मनात येतच नाही. मग साधकाच्या मनात हे विचार आले कसे? 

पुष्कळ कथासंग्रह किवा कादंबरींमधे रावणाने ब्राम्हाला प्रसन्न करण्यासाठी आपले दहा मस्तक कापले असा संदर्भ देण्यात आला आहे, तर काही कादंबरींमधे रावणाने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे केल असा संदर्भ आहे. पण ही कथा लिहीतांना या दोन्ही गोष्टी मला तर्कसंगत वाटल्या नाही. माझ्या मताप्रमाणे याला एक वेगळच कारण होत. रावणाने भगवान शंकरालाच प्रसन्न करायला आपले मस्तक कापले नाही अस स्पष्टपणेच या भागात सांगण्यात आल आहे. पण यालाही एक तर्कशुद्ध कारण नक्कीच असल पाहीजे असा विचार वाचकाच्या मनात नक्कीच येईल. आणि हो! याला एक कारण आहेच आहे, पण या सगळ्या गोष्टींचा उलगडा या कथेचा शेवटचा भाग "शिवमय मी - भाग ३" मधे होणार आहे. तरीही या भागात रावणाने केलेली सगळी खटाटोप पुढल्या भागात अधिकच खुलून येईल आणि वाचकांना नक्कीच आवडेल.

शेवटी भगवान शंकर रावणाला प्रसन्न तर होतातच. आणि त्याला जगावेगळे  तीन असे वर देतात की ज्याने रावण जगजेत्ता होतो. हे वर काय व कोणते हे तिसऱ्या भागातच कळेल. आणि याहूनही या कथेचा सगळ्यात महत्वपुर्ण भाग म्हणजे "रावण शिवमय का?" याच उत्तर सुद्धा त्याच भागात मिळेल. तोपर्यंत....तुम्ही पण शिवस्तुती करा आणि शिवमय व्हा...

ओम नम: शिवाय.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog