शिवमय मी (भाग ३) - कथा

निसर्गात झालेल्या अचानक बदलामुळे मी संभ्रमीत अवस्थेत होतो. परंंतु अधिकारवाणीत झालेल्या



आदेशामुळे मी भानावर आलो. यज्ञकुटीतला अग्नी केव्हाच विझला होता. अवतीभवती असलेला पालापाचोळा हवेत फेकला जाऊ लागला. हवेवर झुलणारी वाळलेली पान अचानक एकाच जागी हवेवरच स्थिरावली. पालापाचोळ्याच्या एका लयबद्ध गोलाकार आकारात मी आणि शिवलिंग झाकोळल्या गेलो. त्या गोलाकारात मी आणि शिवलिंगच होतो.

खरच, काय होत तिथे? तिथे अंधार असुनही नव्हता. क्षणात मी निसर्गात होतो तर क्षणात मी अंतरीक्षात. विविध तारे शिवलिंग आणि माझ्याभोवती झुलत होते, चकाकत होते. शंकराच्या सगळ्या आवडत्या गोष्टी शुभ्र प्रकाशाच्या आकारात अधुनमधुन प्रगट आणि त्यातच लय पावत होत्या. त्यामधे, पाषाणातला शिवमंदिरासमोरचा बसलेला नंदी, शिवाची आवडती वीणा, डमरू, कोणालाही न पेलनार शिवाच अव्दितिय त्रिशुल. मधातच शिवाच्या गळ्याभोतती विराजमान राहणारा सुवर्ण सर्प सरपटत जात होता. संपुर्ण अंतरीक्षात "ओम" चा वीणा, डमरू आणि घंटानादाच्या संगतीत स्वर्गीय सुर पसरला होता. असल अत्भूत दृष्य मी आयुष्यात प्रथमच अनुभवत होतो.

क्षणात शिवलिंगाच तेज वाढायला लागल. मी लहान होतोय की शिवलिंग मोठ होतय हेच कळेणास झाल. त्यावरच शिवगंध आणि मध्य नेत्र प्रकाशुन ऊठल. शिवलिंगाच्या रूपाने माझ्यासमोर विशाल पर्वतच उभा होता की काय हेच कळत नव्हत. मी हात जोडून ते सगळ दृष्य बघत होतो.
अधिकारवाणीतला आवाज पुन्हा गुंजारला.
"हे रावण..."

कोणाचा होता तो आवाज? तो आवाज होता अनंतापर्यंत पवित्र असणाऱ्या शिवाचा,  रौद्र रूप धारण करून तांडव नृत्य करणाऱ्या रूद्राचा, सगळ्या विश्वाला अमृत देऊन स्वतः विष प्राशन करणाऱ्या निलकंठाचा, एका क्षणात सगळ्या विश्वाला भस्म करू शकणाऱ्या त्रिनेत्राचा, संपुर्ण गंगेला आपल्या जटेत धारण करणाऱ्या गंगाधराचा, सदासर्वदा हिसंक पण तरीही शांत अश्या विरभद्राचा.

"तुझी तपस्या भंग पावली नाही तर पुर्ण झाली आहे"

"तुझ्या मनात कामुक विचाराची ऊत्पत्ती करणारा मीच आहे. तूझ शीर धडावेगळ करण्याआधी तुझ्या मनात ज्याकाही विचारांनी गोंधळ माजवला, ते सगळे विचार मी तुझी परिक्षा घ्यासाठी निर्मीत केले. ते जगातले असे विचार, ज्यांनी सगळ्या जीवांना ग्रासुन घेतले आहे आणि तेच प्रत्येकाच्या नाशासाठी कारणीभूत ठरतात"
"या प्रत्येक विचारानंतर तुझ शीर तु मला अर्पण केल आणि भक्तीच्या पराकाष्ठेच्या मर्यादा तु ओलांडल्या, यावर मी प्रसन्न होऊन तुझे नऊ मस्तक तुला परत करतो. तुझ दाहावं मस्तक हे तुझी बुद्धी या गुणाचं प्रतिक ठरेल. हे तुझे सगळे दहा मस्तक या दहा गुणांवर विजय मिळवल्याच प्रतिक ठरेल. आजपासुन हे विश्व तुला दशानन या नावाने ओळखेन."

"तुझी ही तपश्चर्या तु कोणत्या ईच्छेसाठी आरंभली होती ती मला सांग, मी ती ईच्छा पुर्ण करेन."
मनात आनंदाचा डोंब उसळला होता. तपश्चर्या पुर्ण झाली होती, मी दशानन झालो होतो. माझ्या सगळ्या ईच्छा आकांक्षा आता पुर्ण होणार होत्या. मी अमरत्वाची आस धरून महादेवासमोर उभा ठाकलो होतो. पण तरीही मनात कुठेतरी हूरहूर होत होती, कसलीतरी कमतरता मनात भासत होती. आणि तोच क्षण माझ्या जिवनातला अमुल्य क्षण ठरला, आणि एक छोटीशी ईच्छा मी महादेवासमोर बोलुन गेलो.

"हे शंकरा... तुम्हाला वर मागण्याआधी तुमच्या या भक्ताला तुमच सुंदर रूप बघण्याची ईच्छा आहे"

महादेवाला भोलेनाथ का म्हणतात हे मला तेव्हा कळल. महादेवाच फक्त रूप बघण्याची ईच्छा मी व्यक्त केली होती, पण भोळ्या शंकराने शब्दशहा जाऊन मला त्यांच्या सुंदर रूपातल दर्शन दिल.

हळुहळु शिवलिंग अनंतात लय पावायला लागल. उरल फक्त ते त्यावरच शिवगंध आणि त्या मधला तिसरा नेत्र. शिवगंधाच्या मागे निळा रंग पसरू लागला. साक्षात भगवान शंकर प्रगट होऊ लागले. शंकराचा चेहरा, जटा, बाहू, डोक्यावर धारण केलेला चंद्र, परिधान केलेल व्याघ्रचर्म, हातात धरलेल असाधारण त्रिशुल अस सगळ काही निर्माण होऊ लागल. काही क्षणातच संपुर्ण शिव माझ्यासमोर उभे ठाकले. शंकराच्या चेहऱ्यावर दिव्य अशी आभा पसरली होती. नेत्रातून प्रचंड तेज वाहात होत. पराकोटीची शांतता संपुर्ण चेहऱ्यावर जाणवत होती. ओठांवर मंद मंद हास्य तरळत होत.

डोक्याच्या मध्यभागी रूद्राक्षांच्या माळेने जटाचा जुडा बांधला होता. त्यातच लिलया एक छोटस बिल्वपत्र खोचलेल होत. डोक्यावरून जटांसांभार मानेवर रूळला होता. जुड्याच्या मध्यभागी जटांवर चंद्रकोर बांधली गेली होती. माथ्यावरच्या जटावर शीतल चंद्राची श्वेतप्रभा फाकली होती. कानातले लांबसडक कुंडल उठून दिसत होते. संपुर्ण शरीर निळ्या रंगाच होत आणि त्यातच लालरंगी रेषा अधुनमधुन चमकत होत्या. फक्त कण्ठ हा आकाशी रंगाने प्रकाशीत होत होता. गळ्यातला सुवर्ण सर्प फणा ऊभारून ऊभा होता. गळ्यात रूद्राक्षांच्या माळा होत्या. ऊजव्या खांद्यांवरून व्याघ्रचर्म मांडीपर्यंत उतरत गेल होत. हातापायावर राखेचे तीन शुभ्र पट्टे ओढलेले होते. शंकराची किरकोळ, निलमय शरीरयष्टी, रापलेल अंग, घट्ट पिळदार बाहू, उन्नत स्कंध, रेखीव आणि भव्य छाती पाहून मी हरवून गेलो.

ते दृष्य पाहून कधी न लाभलेली प्रसन्नता त्या क्षणाला लाभली होती. आजपर्यंत असे निर्मीत होणारे अनेक दृष्य मी जीवनकाळात बघितले होते. सामान्य जीवांना हा चमत्कार वाटे, पण त्यामागच विज्ञान मी जाणून होतो. माझ्यासाठी अश्या गोष्टी नवीन नव्हत्या. पण ही असाधारण गोष्ट काही वेगळीच होती. त्यात कोणतीही माया नव्हती, त्यात कसलही विज्ञान नव्हत. त्यात होत ज्ञान आणि विज्ञान याच्याही पलिकडची स्थिती, म्हणजेच प्रज्ञान. म्हणुनच चराचरात शिव वावरतो, सातही सुरात वास करतो.

आज मला सर्वाथाने समजल होत की वीणाच्या साथीत उच्च रागात गायन करतांना मी का माझ भान हरवून बसतो, का माझ मन तल्लीन होत. शंकराला बघुन तसच मन तल्लीन झाल होत. गायन केलेल्या रागातला शिव आज मी जाणला होता.

"माग दशानना, तुझा ईच्छित वर माग. मी तो पुर्ण करीन"

डबडबलेल्या नेत्रांनी बघत मी शंकराकडे बघत होतो. इतक सुदंर रूप बघितल्यावर मनात कसलीही ईच्छा राहीली नव्हती. मी स्वतः सुद्धा त्या दिव्य स्वरूपात कुठेतरी हरवुन गेलो होतो. गहिवरलेल्या आवाजात मी पुढे बोलु लागलो.

"हे शशिशेखर (ज्याने डोक्यावर चंद्र धारण केला असा तो),
हे नीललोहित (जो रंगाने निळा आणि लाल आहे),
हे शूलपाणी (ज्याच्याजवळ त्रिशुल आहे असा तो),
हे श्रीकण्ठ (ज्याचा गौरवी कंण्ठ आहे),
हे कपाली (ज्याने कवट्यांची माळ परिधान केली आहे),
हे जटाधर (ज्याच्या केसांच्या जटा आहे),
हे स्वरमयी (जो सातही सुरांमध्ये वास करतो),
हे गणनाथ (जो गणांचा देव आहे),
हे व्योमकेश (ज्याचे केश संपुर्ण आकाशात पसरले आहे),
हे भुजंगभूषण (जो सुवर्ण सर्पाने सुशोभित आहे)"

"अमर होण्याची ईच्छा घेऊन मी ही तपस्या आरंभीली होती, पण हे कृपानिधि तुझ मोहून टाकणार सुंदर रूप मला अमृतापेक्षाही श्रेष्ठ वाटतय."

"तुझ्या या सुंदर रूपाची तुलना जगात कोणात्याही मोहक रूपाशी, कोणत्याही श्रेष्ठ वस्तुशी, कोणत्याही पवित्र नात्याशी, कोणत्याही उच्च सन्मानाशी किवा कोणत्याही मोठ्यातल्या मोठ्या सुखाशी नाही"

"हे दयाधना,"
" माझ सुख, दुख, ईच्छा, आकांक्षा, अभिमान, मोह सगळ सगळ काही तुझ्या फक्त दर्शनामूळे एका क्षणात नष्ट झाले. मला आता ना अमृताची ओढ आहे ना सत्ता साम्राज्याची. ओढ लागलीय ती आता फक्त तुझ्या या सुंदर रूपाची. हे शंकरा, मला आता फक्त एकच वर दे, आणि तो म्हणजे जिवंत असेपर्यंत तुझी अगाध भक्ती करण्याच्या. तुझ्याच भक्तीत मला तल्लीन होऊ दे. भक्तीच्या सगळ्याच मर्यादा मला ओलांडु दे"

" नेत्रांच्या प्रत्येक सुंदर दृष्यात, कर्णांच्या प्रत्येक गोड आवाजात, स्पर्शातल्या प्रत्येक अनुभवामध्ये, जिव्हेच्या प्रत्येक चवीमध्ये आणि श्वासांबरोबर आलेल्या प्रत्येक सुगंधात मला फक्त तुलाच अनुभवू दे"
"मला शिवमय होऊ दे...."

"मी बोलेल शंकर, मी चालेल शंकर,
मी ऐकेल शंकर, मी बघेल शंकर...

माझ्या स्वरात शंकर, माझ्या सुरात शंकर,
माझ्या मनात शंकर, माझ्या ध्यानात शंकर...

तृष्णा शंकर, तृप्ती शंकर,
प्रेम शंकर, भक्ती शंकर...

माझ्या शस्रात शंकर, माझ्या शास्रात शंकर,
माझ्या विद्येत शंकर, माझ्या वेदात शंकर...

अग्नी शंकर, वायु शंकर,
भुमी शंकर, आकाश शंकर

जिथवर दृष्टी, तिथवर शंकर
फक्त शंकर.... फक्त शंकर...."

"श्वास तु, ध्यास तु,
या भक्ताला लागलेली आस तु,
शंकरा.... सुरवात जरी तु नसला,
शेवट आता फक्त तु, शेवट आता फक्त तु..."

मन आनंदुन आल होत, कण्ठ गहिवरून आला होता. समिश्र विचारांनी मन भरून गेल होत. गंगेच्या प्रवाहासारख पाणी नेत्रातुन वाहात होत. एक आगळ वेगळच समाधान त्या सुदंर रूपाच्या दर्शनाने मनात ठाण मांडुन बसल होत. चेहऱ्यावरच स्मित हास्य तसच ठेवत भगवान शंकर पुढे बोलु लागले.

"राक्षस, मानव, यक्ष, किन्नर, नाग ईत्यादी जीव माझी तपस्या करतात आणि मला प्रसन्न करून वर मिळवतात. कोणाला अधिक सामर्थ मिळवायच असत, कोणाला तिन्ही लोकांवर राज्य करायच असत, तर कोणाच्या सांसारीक ईच्छा असतात"

"पण या सगळ्या गोष्टींचा त्याग करून, निस्वार्थ भावनेने तु मला भक्तीचा श्रेष्ठ असा वर मागितला आहे. हे रावण, तुझ्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन मी तुला दोन वर देतो. मी तुला पहिला हा वर देतो की काळाच्या अनंतापर्यंत तुझ्यासारखा भक्त कधीही होणार नाही. संपुर्ण ब्रम्हांडात अलौकीक शिवभक्त म्हणून तु ओळखला जाशील. सगळ्या भक्तांमध्ये तु मला प्रिय असशील."

"अमर होण्याची ईच्छा घेऊन तु तपश्चर्या सुरू केली होती. पण या जगात कोणीही अमर नाही आणि हाच सृष्टीचा नियम आहे. दुसऱ्या वराच्या माध्यमातून मी तुला अमृत देतो, ज्याच्यामुळे तु अनंत काळापर्यंत जीवंत राहू शकशील. हे अमृत तुझ्या नाभीमधे एका कुपीच्या माध्यमात स्थित राहील. एक कुंड ज्याप्रमाणे जीवांना पाणी पूरवत राहत, त्याप्रमाणे ही कुपी एका कुंडाप्रमाणे तुला अमृत पूरवत राहील. पण जेव्हा ही कुपी नाश पावेल तेव्हा तु एक साधारण राक्षसच होशील"

एवढ बोलुन भगवान शंकर अंतर्धान पाऊ लागले. मी शक्य तेवढ ते सुंदर रूप डोळ्यात साठवुन घेतल. पालापाचोळ्याच्या वलयातून एक प्रकाशकिरण निघून आकाशातल्या अनंतात स्थिरावला. हवेवर स्थिरावलेली सगळी पान भुमीवर गळून पडली. बाजुलाच ठेवलेला कमंडलु हातात घेतला आणि वनाबाहेरचा मार्ग मी धरला. मनातल्या प्रत्येक विचारात, दृष्यात, आवाजात फक्त भगवान शंकरच होते.

जिवनातल्या कर्मकांडाच्या उन्हामध्येही भक्तीची सावली कीती अल्हादायक असते याची प्रचीती आज मला आली होती. आणि याच सावलीने मी संपुर्ण वेढाऊन गेलो होतो, खऱ्या अर्थाने आज मी शिवमय झालो होतो. अमृताची ढाल मागून मी जग जिंकायला निघालो होतो, पण भक्तीच दान घेऊन स्वतःलाच हरून आलो.
समाप्त.

उपसंहार
"शिवमय मी" ही स्वतंत्र कथा नसून रामायणातल्या कथेचा फक्त एक भाग आहे. हा भाग येथेच समाप्त करीत आहोत. रावण....एक राक्षस, एक ब्राम्हण, एक क्षत्रिय, एक राजा, एक विद्वान आणि रामायणातला मुख्य खलनायक. पण या सगळ्यामधूनही तो एक सर्वश्रेष्ठ शिवभक्त. रावणाने खऱ्या अर्थाने शिवाला जाणले होते. सातही सुरातला शिव त्याने अनुभवला होता. सांसारीक सुखाचा त्याग आणि वैरागयाचा ध्यास हाच शंकराचा मार्ग होता. पण तरीही तो शंकराच्या वैरागी मार्गाकडे कधीच गेला नाही. सर्वश्रेष्ठ शिवभक्त असुनही रावण शंकराच्या मार्गावर का चालला नाही हा प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे.

भगवान शंकर प्रत्येक भक्ताची परिक्षा घेतातच अस नेहमीच आजकालच्या कथा चित्रपटांमध्ये बघायला मिळते, आणि ही घेतलेली परिक्षा अधिकच सोपी असते. पण वास्तवात खरच इतकी सोपी परिक्षा होण मला शक्य वाटत नव्हत. म्हणुनच ही शंकराने घेतलेली परिक्षा मी या विचारांच्या दृष्टीकोनातुन मी मांडली. ज्यामध्ये रावणाला विविध विचार येतात, पण त्याला शेवटपर्यंत कळत नाही की ही त्याची परिक्षा होती. शिवमय मी - भाग २ जर पुन्हा वाचले तर रावणाच्या मनात आलेले विचार, जे त्याची परीक्षा घ्यायसाठी निर्मीत केले ते अनुक्रमणे अश्याप्रकारे होते काम(वासना), क्रोध, मोह, लोभ, अहंकार, घृणा, ईर्षा, पश्चाताप आणि चित्त. आणि ते विचारही त्याच प्रकारे शिवमय मी-भाग २ मधे मांडले गेले आहे. भारतामधे रावणाचे दहा मस्तक, हेच दहा गुण दर्शवतात असे मानले जाते आणि दसऱ्याला त्याच पुतळ्याचा दहनविधी होतो.

पण जगात पुष्कळ ठिकाणी रावणाचे मंदिरसुद्धा आहेत. चौसष्ठ शस्त्र आणि कलांमध्ये पारंगत असलेला रावण, ज्याची सहा मस्तक शास्त्राचे आणि चार मस्तक वेदांचे गुण सुध्दा दर्शवतात, आणि यामुळेच त्या युगातला तो सर्वश्रेष्ठ ठरलेला विद्वान. रावणाने गायलेली शिवस्तुती आजच्या युगातही मोठ्या भक्तीने गायली जाते.

पण सर्वश्रेष्ठ विद्वान असतांनासुध्दा रावण हा सीतेच्या मोहाला बळी का पडला? सर्व शस्त्र कलांमध्ये पारंगत असुनही एका मानवाशी कसा हरला? आणि खरच रावणाला मारण इतक सोप होत का? श्रीराम त्याकाळचा सर्वश्रेष्ठ नायक, तर रावण त्याकाळचा सर्वश्रेष्ठ खलनायक. ह्या दोन दिग्गजांच झालेल असाधारण युद्ध किती घनघोर होत? आणि श्रीराम यामध्ये कसे विजयी झाले? ह्या सगळ्या गोष्टींची एक झलक, एका नव्या कल्पनेने पुढे येणाऱ्या "अमृतकुंड" या भागात सादर करील. तोपर्यंत तुम्हीपण शिवभक्ती करा आणि शिवमय व्हा.

ओम नम: शिवाय.
१९-फेब्रुवारी-२०१६

Comments

  1. संपवला हा भाग पण. कधी कधी दुसरी बाजू ऐकायला बरं वाटत. भावा मग पुढचा भाग कधी?

    ReplyDelete
  2. शिवमय मी हा भाग ईथेच पुर्ण झाला भावा. आता पुढे दुसरी कथा राहील. लिखाण सुरू आहे, शक्य तेवढ्या लकर publish करेल. Hope ती कथापण तुला अधिक आवडेल. या कथेबद्दल तुझे काही विचार असतील तर आवर्जुन सुचव. :)

    ReplyDelete
  3. Khup chhan Ashish.....!keep it up.

    ReplyDelete
  4. Khup chhan Ashish.....!keep it up.

    ReplyDelete
  5. मस्त रे.. असाच लिहत जा.. 👍👍

    ReplyDelete
  6. मित्रा प्रत्येक भागावर comment देण्यापेक्षा पूर्ण वाचून शेवटी बोलणे योग्य वाटले म्हणून हा अभिप्राय आत्ता देतोय. सर्वप्रथम अभिनंदन तुझ. आज वेगळा मार्ग सापडला तुला जगण्याचा. आता "शिवमय मी" बद्दल… वाचणार्या व्यक्तीला एखादी कथा वाचायला द्यावी आणि वाचकाने ती हुबेहूब डोळ्यासमोर आणावी अशी शब्दरचना आणि प्रसंगांची जोड दिलीय या "शिवमय मी" मध्ये. अभ्यासू माहितीच्या आधारे एका रामायणा सारख्या महाग्रंथामध्ये दडलेलं एक पात्र आणि त्यामागे त्याच्यात असलेली साधकी वृत्ती अचूक टिपल्या गेलीय. असाच लिहित राहा आणि असाच जगण्याचा नवीन मार्ग शोधत राहा हीच सदिच्छा.

    Welcome On Board…!

    ReplyDelete
  7. खरय तुझ म्हणन सागर, खरच मला जगण्याचा नविन मार्ग सापडलाय. "शिवमय मी" चा प्रवास माझ्यासाठी खुपच अनोखा आणि उत्साहवर्धक होता. प्रत्येक भाग लिहीतांना क्षणैक मी रावणाच्या मनात शिरल्याचा भास मला झाला. अजुनही खुप लिहायची ईच्छा तर आहेच, आणि मी शक्यतोवर लिहीतच राहणार. लेखकाच्या मनातल जर वाचकाने अचुक ताडल तर त्या लिखानाचा उद्देष्य पुर्ण झाला अस मला वाटते. तुम्हा सर्वांचा अमुल्य प्रतिसाद, लिखानासाठी दिलेला उत्साह आणि वेळ दिल्याबद्दल मनपुर्वक आभार. धन्यवाद...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog