गिरिधर माझा (भाग - २)

"कुठे आहे ती?" तानसेन कडाडला.

मंदिरातला सगळा जमाव एका लयबध्द शिस्तीत बाजुला झाला. जमावाच्या समोर जेव्हा मी बघितल, तेव्हा ती आम्हाला पाठमोरी बसलेली दिसली. मी एकच कटाक्ष टाकत तिच्या समोर जाऊन उभा राहीलो.

डोक्यावर तिने केसांची जुडी बांधली होती. जुडीवरून कपाळावर उतरलेल्या सोन्या चांदीच्या तीन बिंदी चमचम करीत होत्या. जुडीवरून घेतलेला पिवळा पदर जमीनिवर पसरला होता. सकाळच्या कोवळ्या उन्हाच्या हलक्या नारंगी रंगाचा घागरा तिने परिधान केला होता. अनेक शोभिवंत अलंकार तिने धारण केले होते. ती खरोखरच अप्रतिम सुंदर होती. रेखाबद्ध, सुडौल अवयवांची, कणीदार, निग्रही आवाजाची, पाणीदार, काळ्याशार, टपोऱ्या नेत्रांची ती होती. संपुर्ण राजस्थानी पोषाखात तर ती खुपच उठुन दिसत होती. मी आणि तानसेन तिच्या समोर पोहोचलो तेव्हा ती पायातले घुंगरू सोडीत होती. घुगंरू सोडता सोडताच ती तानसेनाला म्हणाली
"मीच मीराबाई! पण...."
"मी कसलीही निस्सिम कृष्णभक्त नाही, मी तर फक्त कृष्णवेडी आहे.
मी कसलीही पतिव्रता नाही, मी तर कृष्णाची अर्धांगिनी आहे.
मी कसलीही स्वरसम्राज्ञी नाही, मी तर फक्त श्यामसुरांनी वेढलेली आहे.

तिच्या बोलण्यात, तिच्या वागण्यात कसलाच मानवी भाव नव्हता. तिची साधीशी दिलेली उत्तरेसुध्दा जगावेगळी होती. एक अलौकीकता तिच्यामधे झळकत होती.
"माझ्या स्वामींच्या मंदीरात तुमच स्वागत आहे. या बसा!"
"मला क्षमा असावी ब्राम्हणबुवा, मी तुमची कसलीही परिक्षा देऊ शकणार नाही. पण तुम्ही गायलेल्या स्वरांमध्ये सहभाग नक्कीच घेणार मी! माझ्या स्वामींच्या संगतीने" आम्ही समोर बसताच ती म्हणाली.

मला तिच्या बोलण्याचा अर्थ कळलाच नाही. थोड्याच वेळात स्वरांचा पाट सजला. मंदिराबाहेरचे लोक मंदिरात गर्दी करू लागले. मंदिरातला सगळा जमाव गोलाकार बसला. त्यांच्या मध्यभागी मी, तानसेन आणि मीराबाई होतो. आमच्या बाजुलाच वादक आपआपले वाद्य घेऊन बसले होते. विणा, तबला, झांज, पनव असे कितीतरी वाद्य ते घेऊन बसले होते. आपल्यात आज खुद्द तानसेन बसला आहे याची जाणीवसुद्धा त्या जमावाला नव्हती. आज सगळा जमाव तानसेनाच्या स्वर्गीय सुरांचा साक्षी बनणार होता. मंदिरात एकच शांतता नादंली. मंद मंद हवा वाहात होती. एकीकडे तानसेन होता, ज्याची दृष्टी स्थिर होती, ज्याच्या डोळ्यात सिध्धता होती, जो पुर्णपणे तयार होता. तर दुसरीकडे मीराबाई, ती शांतपणे तिचा एकतारा घेऊन बसली होती. तिच्यात ना स्पर्धा करण्याचा भाव होता, नाही तो जिंकण्याचा. मिटल्या डोळी ती तशीच स्तब्ध बसली. मुग्ध. जणुकाही ती या जगातच नव्हती.

त्यातच एकाने विणेचा तान छेडला, स्वर युद्धाला प्रारंभ झाला. तानसेनाने कंठधमन्या फुगवत स्वर्गीय सुरात पहिला राग घेतला.
"सा रे ग प ध नि धा पा ग रे ग म ग रे गा गा गाsss....."
विणेचा लयबद्ध तान वादकाने लगेच छेडला. प्रत्युतरात मीराने दुसरा राग गायला
"सा रे ग प गा रे सा नि रे सा निsss....."
तानसेनाने पुन्हा प्रतिराग गायला
"पा नि रे मा प धा पा ग रे"
तोच तानसेनाला मधेच अडवत तोच राग मीरा ने पुर्ण केला
"म ग रे सा रे नि सा रे साssss......"

मीराबाईचा मंजुळ आवाज हा तानसेनाच्या अगदीच विरूद्ध होता. तशीच लय, तसेच मोहक स्वर, फक्त तो आवाज एका स्त्रीचा. थोडावेळ मला माझ्या कानांवर विश्वासच बसेना. मी थक्क होऊन मीराबाईकडे बघतच राहलो. कित्येक प्रहर दोघांच स्वरयुद्ध सुरूच होत. मंदिरातला सगळा जमाव मंत्रमुग्ध झाला होता. सगळा जमाव स्वरांच मंजुळ पाणी कर्णाद्वारे गटागटा पिऊन मन तृप्त करून घेत होते.

स्वरयुद्ध संपल होत. सगळीकडे शांतताच शांतता पसरली होती. तानसेनाने माझ्याकडे वळुन नजरेनेच ईशारा केला. त्याच्या होकारार्थी नजरेचा भावार्थ मी समजलो. मीराबाई खरच त्याच होत्या जे मी तिच्याबद्दल आजपर्यंत ऐकत आलो होतो. आणि ते मी स्वतः उघड्या डोळ्यानी पाहिल आणि कानांनी ऐकल होत. मी आदरयुक्त नजरेन त्या वक्तीमत्वाकडे बघितल. मी जागेवरून उठलो आणि मीराबाई जवळ गेलो. मीराबाई डोळे मिटुन त्यांच्या समोर ठेवलेल्या कृष्णमुर्ती सोबत काहीतरी बोलत होत्या. तिच बोलन ऐकुन मन हरवुन गेल. कित्येक शब्दांफुलांच्या सुगंधानी मनोमंदीर कोंदुन गेल. ती फक्त स्वरसाम्राज्ञी नव्हती, ती तर शब्दसाम्राज्ञी पण होती. आणि ती अजुन काय काय होती ते खुदाच जाणे. मी कानात प्राण एकवटुन ऐकु लागलो.

"कान्हा, तुला आठवत का रे! वृंदावनात असतांना पौर्णीमेच्या रात्री जेव्हा चंद्राचा मंद मंद प्रकाश पडलेला असायचा, तेव्हा नील सरोवराच्या तळ्याकाठी तु तुझ्या बासरीची तान छेडायचा. आणि तो मी ऐकून वेड्यासारखी तळ्याकडे धावत सुटायचे. तुला शोधत. जसजसा बासरीचा आवाज मोठा होत जायचा तसतसा मनात एक आनंदाची लहर पसरायची. पण तळ्याकाठी मी पोहोचले आणि तु मला लगेच दिसला अस झाल का कधी! नाही, कधीच नाही. तु तिथे नाही हे माहीत असतांनासुद्धा मी अनामिकपणे तिथे पोहोचायचे. जेव्हा तु तिथे नाही दिसायचा तेव्हा मन कावर बावर व्हायच. पाण्यासाठी अत्यंतपणे व्याकुळ झालेला जीव जसा पाणी पिण्यासाठी धडपड करतो, तशीच माझी गत व्हायची. पण तुला कधी कळली का माझी धडपड? एक तान छेडुन लपुन जायचास तु! कुठे पळायचास रे तु?

तुला आठवतो तो दिवस, ज्यादिवशी मी तुला ती भेट दिली होती. तुला भेट द्यायची या विचारानेच मनात आनंदाचा झरा फुटला. तुला बघितल्यावर मला तर राहवेना, म्हणुन तुझा हात धरून तुला आपल्या आवडत्या कदंब वृक्षाखाली घेऊन आले. तुला त्या पाषाणखंडावरून बसवुन जेव्हा तुला पुर्णपणे डोळ्यात बसवले तेव्हा कुठे मन तृप्त झाले. लागलीच तु म्हणाला
"काही वेगळीच दिसते ग तु आज! कशी ते मलाही सांगता येणार नाही. पण नेहमीपेक्षा खुपच वेगळी. काही विशेष आहे का आज?"
"मुकुंदा, आज मी तुला एक आगळी वेगळीच भेट देणार आहे. म्हणुनच सगळ्यामधून इकडे घेऊन आले तुला. माझी भेट तुला नक्कीच आवडेल"

कस रे सांगु तुला, त्या हिरव्याकंच रानवेलींच्या मोरपिसधारी मुकुटात किती शोभुन दिसत होतास तु. मनाच्या गाभाऱ्यात आनंद, समाधानाचे जणु झरेच्या झरेच फुटले.
पण काय सांगु तुला, तुला तस बघितल्यावर आनंदाने वेडीपिशी झाले मी. धावतच जाऊन तुझा निलमय बाहु घट्ट पकडला. तु बासरीची धुन छेडली आणि त्यातच मी कुठेतरी हरवले. तुझ्या खांद्यावर डोक ठेऊन कितीतरी वेळ तुझी बासरीची धुन ऐकत राहाले. तुझ्या अंतरंगाचा ठाव घेत राहाले, रात्री तळ्यात पहुडलेले चांदणे पायाने अस्ताव्यस्त करत.

एक गोष्ट सांगु तुला, पहिले पहिले तु माझी आवड होतास, नंतर तु माझा छंद झाला, पण आता, आता तु माझी सवय आहेस. माझ्या जगण्याचाच एक भाग आहे. कस सांगु तुला, तु माझा प्रत्येक श्वास आहेस.
वृंदावनातुन जातांना तुझी बासरी तर देऊन गेलास, पण तिचे स्वर मात्र द्यायचे विसरलास. ते प्रवेशव्दार ओलांडतांना वैजयंंती माला परिधान करून गेलास, पण जिने ती माला तुझ्या गळ्यात टाकली तिला मात्र तु वृंदावनातच विसरला. जातांना तुच मला म्हणाला होतास ना "आजपासुन तू वृंदावनाची स्वामिनी झालीस", मला तु स्वामिनी बनवुन गेलास खर, पण माझा स्वामी मात्र द्यायचाच विसरलास. मनमोहना! तुच म्हणायचास ना रे, की विरहातच मिलनाच बीज पेरलेल असत. पण विरह तरी कीती? हे मात्र तु सांगायचाच विसरलास. जर मला माहीत असत की तु परत येणारच नाही, तर तुला कधी वृंदावनातून बाहेरच जाऊ दिल नसत.

सावळ्या, एका प्रश्नाच उत्तर देशील का?.....सगळ जग तुलाच शोधत असत ना रे? या जगात आम्ही गोपीका असो, एक स्त्री असो किवा एक पुरूष असो, सगळे कळत नकळत तुलाच प्रत्येकामध्ये शोधत असतात, तुझाच ठाव घेत असतात ना. आता हेच बघ ना, प्रत्येक गोपिकाच मन हे ठाव घेत असत एका श्यामच, एका सावळ्याच, श्रीकृष्णाच नाही. श्रीकृष्णाच ठाव घेत असतो तो पुरूष, अर्जुनासारखा सखा, जो श्रेष्ठ धनुर्धर असुनही मनातुन खोळंबलेला असतो आणि एक आधार शोधत असतो, किवा अवधूतासारखा बंधु जो सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायला निघतो. सावळ्या! तुला तर माहितच आहे ना, प्रत्येक स्त्री एका जन्मात दोन जन्म घेते. पहिल्यांदा एक गोपिका म्हणुन, तर दुसऱ्यांदा आई म्हणुन. पण जेव्हा ती आई होते, तेव्हाही तीच मन तुझाच ठाव घेत असत. फरक फक्त एवढाच की तिच्या मनातल तुझ स्वरूप बदलेल असत. पहिले तु तिच्यासाठी घनश्याम होतास, तिचा गिरिधर होतास, तिचा प्रियकर होतास, पण नंतर, नंतर तिच्यासाठी तु खोडकर नटखट कान्हा असतोस, बाल गोपाल असतोस, तिच संपुर्ण जग असतोस. अशी कसली मोहीनी टाकुन गेलास रे तु या जगावर?....सांग ना सावळ्या?...सांग ना?"

गिरिधरा! तु वृंदावनातुन गेल्यावर प्रत्येक रात्री त्या तळ्याकाठी मी तुझी प्राणप्रिय बासरी घेऊन तुझी वाट बघत राहीले रे मी. त्या प्रत्येक रात्री, ना त्या मुरलीची धुन माझ्यासोबत होती, ना मला आधार देणारा तो निलमय बाहू. होत्या त्या फक्त फुलमालांनी सजलेल्या उंचच उंच हिंदोळ्यावरच्या आठवणी. तुझी वाट तर मी तेव्हाही बघितली, आजही बघतेय आणि मी ती जिवनभर बघायला तयार आहे. सावळ्या! तुला यावच लागेल, कारण मला कोणीच स्वीकारल नाही... मी तुझी आहे असं समजुन. सांग ना रे, येशिल ना तु? येशिल ना?"

तिच बोलन ऐकुन माझ्याही डोळ्यात अश्रु तरळलेे. मंदिरातला प्रत्येकजण अश्रु ढाळीत होता. एका अपुर्व प्रेमाची जणु गाथाच तिने माझ्यासमोर उकलुन ठेवली होती. एक गाथा वासनारहित, भावभरित, अतुल प्रेमयोगाची, मधुरा भक्तीची. असल अत्भुत प्रेम मी आजवर फक्त पाहीलच नव्हत, तर ते मी तिच्या माध्यमातुन अनुभवल होत. तिच्या समोरच ठेवलेल्या त्या कृष्ण मुर्तीकडे मी बघितल, ती मुर्ती अंधुक अंधूक दिसत होती. भावनांचा उद्रेक झाला आणि मी माझ्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली.  हळुच माझ्या झोळीत हात टाकुन मी रत्नांजडीत हीऱ्यांचा हार बाहेर काढला आणि कृष्ण मुर्तीच्या पायाजवळ ठेवला. आमच्या धर्मात मुर्तीची पुजा किवा आराधना करणे हे पाप मानले जायचे हे ही मी काही क्षणासाठी तिच्या त्यागापुढे विसरून गेलो होतो. माझा खुदा खरच किती रूपात वावरतो आणि तो खरच किती श्रेष्ठ आहे हे आज मला कळुन चुकल होत. त्याच्यापर्यंत पोहोण्याचा एक मार्ग आज मी तिच़्याकडुन शिकलो होतो. तिच बोलण कधीच न संपाव. तिनं बोलतच राहाव आणि मी ऐकतच राहाव, असा क्षणीक विचार माझ्या मनात तरळुन गेला.

तानसेनाला नजरेनेच इशारा करत मी उभा झालो. मंदिराच्या पायऱ्यावरून उतरतांना मन भरून आल आणि वारंवार एकच प्रश्न विचारत होत "खरच! कोण होती ती?". आणि उत्तर आल...
"ती एक स्वरसम्राज्ञी...
ती एक शब्दसम्राज्ञी...
ती एक गुरू...
ती एक मैत्रिण...
ती एक प्रेयसी...
ती एक अर्धांगिनी...
ती कृष्णवेडी... ती मीराबाई..."
क्रमश:


उपसंहार
"गिरिधर माझा" लिहीतांना सगळ्यात मोठी एकच गोष्ट माझ्यासमोर होती, आणि ती म्हणजे "अनिश्चितता". काय लिहाव याची पुसटशीही कल्पना मला नव्हती. पण मीराबाई बद्दलच लिहायच हे मात्र मी ठरवूनच होतो. मराठी साहीत्यात मीराबाई बद्दल मला कसलच लिखान सापडल नाही. त्यानंतर Internet वरच वाचन सुरू केल. मग मीराबाईचा जिवनपटातले तीन महत्वाचे प्रसंग "गिरिधर माझा" मधुन लिहीण्याचा निर्णय घेतला. त्यामधला हा पहिला प्रसंग इथेच संपवत आहो. जेव्हा कृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला, तेव्हा त्यांना गिरिधर हे नाव पडले. आणि मीराबाई सुद्धा कृष्णाला गिरिधर या नावानेच संबोधत होत्या, त्यावरूनच प्रेरीत होऊन कथेच नाव मी "गिरिधर माझा" अस ठेवलय.

ही कथा एका स्त्रीच्या दृष्टीकोणातुन लिहीनं खरच खुप मोठ आव्हान होत. या भागामधल स्वरयुद्ध माझ्या मनात काहीतरी वेगळच आहे, अनाकलनीय आहे. आणि ते शब्दात मांडण तर खुपच अवघड. या भागातील शब्दावली ही मीराबाईच्या दोह्यामधुन प्रेरीत आहे. मीराबाईचे प्रसिद्ध दोहे "मै तो प्रेम दिवानी", "पग घुंगरू बांध मीरा नाची रे", "ऐसी लागी लगन", "वो काला एक बासुरीवाला" हे तर मन हरवुन टाकणारे दोहे आहे. या भागातला पुष्कळसा भाग हा नेहमीप्रमाणेच कल्पनांनीच गुंफलेला आहे, पण कथा मात्र नेहमीप्रमाणे सत्यच आहे.

या कथेचा हा भाग लिहीतांना पुष्कळश्या विचारांचा जन्म झाला. त्यासोबतच "कृष्ण आणि मी" या एका वेगळ्याच कल्पनेने मनात जन्म घेतला. कदाचीत मीराबाईच्या अथांग माहासागराएवढ्या कृष्ण प्रेमाचा एका थेंबाएवढा जन्म माझ्याही मनात झाला. "कृष्ण आणि मी" या कोड्याचा उलगडा मी लवकरच पुढे करेल. एक गोष्ट मला पुन्हा ईथे आवर्जुन सांगायची आहे, ती ही की माझ्या या पण कथेच मुर्तीमंत चित्र नेहमीप्रकारे माझी लाडकी बहीन डॉ. योगिनी किरपान खोरगडे यांनी रेखाटलेल आहे. कधी कधी मला अस वाटत की Facebook वर माझ्या कथेपेक्षा तिच्या रेखाटलेल्या सुंदर चित्रांनाच जास्त likes येतात :).

"गिरिधर माझा" याचे पुढे येणाऱ्या दोन भागांना आता थोडा विराम देतोय. कारण पुढच्या दोन भांगासाठी लागणारी सिध्दता बरीच मोठी आहे. पण येणाऱ्या मधल्या काळात माझी स्वप्नकथा, जिने माझ्या मनात गोंधळ माजवुन ठेवला आहे, ती कथा "अमृतकुंड - War Redefine" ही समोर प्रस्तुत करीन. समरांगणप्रिय युद्धवेड्यांना ही कथा नक्कीच आवडेल अशी आशा करतो. तोपर्यंत तुमच्या मनात असलेल्या कृष्णाला जपा, त्याचा निरंतर शोध घेत राहा आणि  त्याच्यावर जीव ओतुन प्रेम करा.

हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे

९-एप्रिल-२०१६

Comments

  1. Khup chhan Ashish. I think you need to publish all your literature.

    ReplyDelete
  2. Thanks Ravi.... That will be the biggest day of my life... :)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog